Sanjay Raut : “कुठे गेला मंत्र्याचा फरार मुलगा?”; विकास गोगावलेंच्या जामीन अर्जावरून संजय राऊतांची गृहखात्यावर सडकून टीका

Sanjay Raut On Maharashtra Police : “पोलीस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतील भाजपची टोळी?”; महाडमधील हल्ल्याच्या प्रकरणावरून राऊत आक्रमक
मुंबई | महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले Bharat Gogawale यांचा मुलगा विकास गोगावले Vikas Gogawale याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरत, “गुन्हेगारांना गृहमंत्र्यांचे अभय आहे का?” असा संतप्त सवाल विचारला आहे.
हायकोर्टाने फेटाळला जामीन, तरीही आरोपी फरार!
महाडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत संजय राऊत म्हणाले:
“एका कार्यकर्त्याला ठार मारण्यासाठी ‘अटेम्प्ट टू मर्डर’चा प्रयत्न झाला. हायकोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला आहे, याचाच अर्थ हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. तरीही मंत्रीपुत्र पोलिसांना सापडत नाही, हे आश्चर्यकारक आहे. मंत्र्यांची मुलं, भाऊ किंवा नातेवाईकांनी खून, दरोडे किंवा भ्रष्टाचार केला तर त्यांना फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक अभय देतात का?”
पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
संजय राऊत यांनी पोलीस दलावर टीका करताना अत्यंत बोचरी भाषा वापरली. “राज्यात पोलीस यंत्रणा शिल्लक आहे की ही खाकी वर्दीतील भाजपची टोळी आहे? विधानसभेत ‘कोणालाही सोडणार नाही’ अशी मोठी भाषणे देणारे आता गप्प का आहेत? मंत्र्यांचे बाप, मुलं आणि भाऊ गुन्हे करून कसे काय सुटतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, 48 तास बेपत्ता होणाऱ्या मंत्र्यांचा (कोकाटे) उल्लेख करत त्यांनी सरकारमधील अनागोंदीवर बोट ठेवले.
“भाजपचा पराभव करण्यासाठी कोणीही येत असेल तर स्वागतच”
महायुतीमधील अंतर्गत संघर्षावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “जर भाजपसोबत सत्तेत असलेले लोकच त्यांचा पराभव करण्यासाठी इच्छुक असतील, तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने गुंडागर्दी, दहशतवाद आणि यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे, ते पाहता भाजपला रोखणे काळाची गरज आहे.”
नेमके प्रकरण काय?
महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अटकेच्या भीतीने विकास गोगावले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचे कृत्य गंभीर असल्याचे मानत अटकपूर्व जामीन नाकारला आहे.


