
Eknath Shinde On Mumbai BMC : मोठ्या नाल्यांची 85 टक्के तर छोट्या नाल्यांची 65 टक्के सफाई पूर्ण; कामात हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
मुंबई :- पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील नालेसफाईच्या कामांना गती देत 7 जूनपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी महापालिका प्रशासनाला दिले. काल झालेल्या पाहणी दौऱ्यात भांडुप, वडाळा आणि दादर परिसरातील नाल्यांची पाहणी करताना त्यांनी कामाची सविस्तर माहिती घेतली.





भांडुप येथील उषा नगर, उषा कॉम्प्लेक्स, तसेच नेहरूनगर नाला, वडाळा आणि धारावी टी जंक्शन येथील सफाईकामांची पाहणी करताना वेळेआधी पाऊस सुरू झाला असला तरीही कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
महापालिकेच्या अहवालानुसार, सध्या मोठ्या नाल्यांची 85% आणि छोट्या नाल्यांची 65% सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित कामासाठी 15 दिवस उपलब्ध असून, ते वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच नाल्यातून काढलेला गाळ 48 तासांच्या आत हटवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
यंदा मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने नालेसफाई केली जात आहे. यामध्ये एआय तंत्रज्ञान व रोबोटिक्सची मदत घेण्यात येत असून, रेल्वे कल्व्हर्टखालील सफाईही अत्याधुनिक पद्धतीने केली जात आहे.
महापालिकेने पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करून 422 ठिकाणी पंप, 2 होल्डिंग पाँड, आणि 10 पंपिंग स्टेशन कार्यान्वित केली आहेत.
याच दौऱ्यात विक्रोळीतील सूर्या नगर, जो दरडप्रवण क्षेत्र आहे, तिथे संरक्षक जाळी बसवण्याचे आदेश देण्यात आले. स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची शिफारसही यावेळी करण्यात आली.
दादरमधील कासारवाडी सफाई कामगार वसाहतीला भेट देऊन, तिथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, अभ्यासिका आणि इतर सुविधा यांचीही पाहणी करण्यात आली.


