मुंबई

Mumbai News : कबूतर खाण्यावरून जैन समाजाची राजकीय एन्ट्री; ‘जन कल्याण पार्टी’ची घोषणा

•मृत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभेचे आयोजन; ‘आता महापालिकेत आमचे उमेदवार’; जैन मुनींकडून सरकारला इशारा; ‘कबूतरांची पार्टी पाहिजे, चिन्ह कबूतर असेल’

मुंबई :- मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या कबूतर खाण्याच्या प्रश्नावरून जैन धर्मियांनी थेट राजकारणात उतरण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात मृत्यू पावलेल्या कबुतरांच्या आत्मशांतीसाठी आज (11 ऑक्टोबर) मुंबईत आयोजित केलेल्या धर्मसभेनंतर जैन मुनींनी पत्रकार परिषद घेत ‘जन कल्याण पार्टी’ या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली.

‘जन कल्याण पार्टी’ची घोषणा

यावेळी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाही, त्यांना केवळ राजकारणासाठी कबूतर आणायचे आहेत. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही.” जैन समाज सर्वाधिक कर भरत असल्याचे सांगत त्यांनी आता महापालिकेत आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली.

‘जन कल्याण पार्टी’ नावाच्या या नव्या पक्षाचे चिन्ह कबूतर असेल, अशी घोषणा निलेशचंद्र विजय यांनी केली. “ही फक्त जैनांची पार्टी नाही, तर ही गुजराती, मारवाडीची पार्टी आहे. आमच्या पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री आहे,” असे ते म्हणाले.

‘डॉक्टरांनाही मूर्ख मानतो’ – कैवल्य रत्न महाराज

धर्मसभेत बोलताना जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान केले. “कबूतर शांतताप्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीरामांनी एवढं केलं, तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी डॉक्टरांवरही टीका केली. “मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं? दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही,” असे विधान कैवल्य रत्न महाराज यांनी केले. कबुतरखान्यावरून सुरू असलेले राजकारण आणि मंत्री मंगलप्रभात लोढा धर्मसभेत गैरहजर राहिल्याबद्दल त्यांनी सरकारवर निशाणा साधत ही ‘सरकारची मिलीभगत’ असल्याचे म्हटले आहे.

vivek

Recent Posts