Mumbai Drugs News : मुंबईत कोकेनचा ‘खेलाडू’ 12 वर्षांसाठी तुरुंगात! आयव्हरी देशाच्या तस्कराचा डाव उधळला, विशेष सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Mumbai university drugs Latest News : नववर्ष स्वागतासाठी कोकेन तस्करीचा प्लॅन होता फेल; एएनसीच्या बांद्रा युनिटने ‘नॅनो’ कारसह 204 ग्रॅम कोकेन केले जप्त
मुंबई :- अंमली पदार्थांच्या तस्करांसाठी मुंबई हे आता ‘सेफ हेवन’ राहिलेले नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंबई पोलिसांनी (ANC) 2021 मध्ये केलेल्या एका हाय-प्रोफाइल कारवाईनंतर, विशेष सत्र न्यायालयाने एका परदेशी नागरिकाला 12 वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या कठोर निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय तस्करांना कडक संदेश मिळाला आहे.
204 ग्रॅम कोकेनसह अटक
गोष्ट आहे 2021 च्या नववर्षाच्या स्वागताची. मुंबईत अंमली पदार्थांची विक्री वाढू नये यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्ष (ANC), बांद्रा युनिटचे पथक गस्त घालत होते. यावेळी वाकोला, सांताक्रूझ (पू) येथील हंस भुग्रा रोडवर होनोरे इग्वे गाही (वय 44) नावाचा आयव्हरी देशाचा नागरिक टाटा नॅनो कारसह संशयास्पद स्थितीत पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पोलिसांनी त्याची कसून तपासणी केली असता, त्याच्या ताब्यात 204 ग्रॅम वजनाचा कोकेन हा महागडा अंमली पदार्थ आढळला. पोलिसांनी कोकेनसह त्याची टाटा नॅनो कार तातडीने जप्त केली आणि त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंदवला.
अवैध वास्तव्याची किंमत मोजावी लागली!
गुन्ह्याचा तपास सुरू असताना, आरोपी होनोरे गाही हा वैद्य कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी मूळ गुन्ह्यात परकीय नागरिक कायदा 1946 नुसार कलम 14-ए (ब) ची वाढ केली.
12 वर्षांची शिक्षा आणि दंडाचा दणका
पोलीस उपनिरीक्षक राम बागम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भोये यांनी या गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने केला. अखेर, 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीत मा. विशेष सत्र न्यायालय, मुंबईने आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे मान्य केले.
न्यायालयाने आरोपीला 12 वर्षे कठोर कारावास आणि 1.25 लाख इतक्या मोठ्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख अधिकारी लखमी गौतम आणि शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली बांद्रा ए.एन.सी. युनिटचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे आणि विशाल चंदनशिवे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. बृहन्मुंबई पोलीस अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मिती’साठी कोणत्याही तस्कराला सोडणार नाही, असा स्पष्ट संदेश या निकालातून दिला आहे.


