Kandivali Fire Accident : कांदिवली आग दुर्घटनेला गंभीर वळण! तीन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांमध्ये दोन सख्या बहिणींचा समावेश

Kandivali Fire Accident News : मिलिटरी मार्गावरील राम किसन मेस्त्री चाळीतील वायू गळतीमुळे लागलेल्या आगीची घटना
मुंबई :- कांदिवली येथील मिलिटरी मार्गावरील राम किसन मेस्त्री चाळीत 24 सप्टेंबर रोजी वायू गळतीमुळे लागलेल्या आगीची घटना आता अधिक गंभीर बनली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांपैकी तीन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
रेखा जोशी (47 वय), नीतू गुप्ता (31 वय) आणि पुनम (28 वय) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. यापैकी नीतू गुप्ता आणि पुनम या दोघी सख्या बहिणी होत्या, त्यांच्यावर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. तर रेखा जोशी या कस्तुरबा रुग्णालयात दाखल होत्या. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तिघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
24 सप्टेंबर रोजी चाळीत अचानक वायू गळतीमुळे ही आग लागली होती, ज्यात एकूण सात जण भाजले होते. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, भाजलेल्या जखमा तीव्र असल्याने तीन महिलांना प्राण गमवावे लागले.
या दुर्घटनेतील उर्वरित चार जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, चाळीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


