Mumbai Crime News : अपहरण, खंडणी आणि कारवाईचा थरार — नागालँडमधून मुंबई गुन्हे शाखेची ‘हाय प्रोफाइल’ अॅक्शन

•दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण; गुन्हे शाखेने नागालँडमध्ये चालवला शर्थीचा शोध
मुंबई | मुंबईतील एका नामांकित व्यावसायिकाचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने नागालँडमध्ये जाऊन मोठी कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, व्यावसायिकाची सुरक्षित सुटका करताना पोलिसांना स्थानिक तणावाच्या स्थितीत तातडीने कारवाई करावी लागली. अटकेनंतर आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून या तीन आरोपींना 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
सदर प्रकरणात, व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दिल्यानंतर, गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि कॉल ट्रेसिंगच्या आधारे नागालँडमधून धागेदोरे शोधले. खंडणीसाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांच्या तपासातून हा भाग उघडकीस आला.
विशेष पथक नागालँडला पाठवले गेले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने व्यावसायिकाची सुटका करण्यात आली. दरम्यान, अटकेतील आरोपी स्थानिक रहिवासी असून, त्यांनी चौकशीत दावा केला की अपहृत व्यावसायिकाने व्यवसाय करारात 25 लाखांची फसवणूक केल्यामुळे त्यांनी हा प्रकार केला. संबंधित तक्रारीची पोलीस खात्याकडून पडताळणी केली जात आहे.
पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, कक्ष-7 प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, प्रभारी पोलीस निरीक्षक मिलींद काठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साठे, पोलीस उपनिरीक्षक काळे, शेलार, कुलकर्णी, पोलीस हवालदार बंगाळे, पोलीस शिपाई होनमाने,पाटील यांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.



