मुंबई

Mumbai Crime News : सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश; १२ जण अटकेत, ६० कोटींहून अधिक फसवणूक उघड

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीसाठी बनावट कंपन्या चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने विविध बँकांचे खाते व सिमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून देशभरात तब्बल ६० कोटी ८२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-२, गु.अ.वि., मुंबई यांनी कांदिवली (पूर्व) येथील डी.जी. सर्च कन्सलटन्सी व प्रिरीत लॉजिस्टीक प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सुरू असलेल्या बोगस कंपन्यांवर १२ ऑगस्ट रोजी छापा टाकला. छाप्यात आरोपी वैभव पटेल, सुनिलकुमार पासवान, अमनकुमार गौतम, खुशबु संदराजुळा व रितेश बांदेकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून २ लॅपटॉप, १ प्रिंटर, २५ मोबाईल फोन, २५ पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड, स्वाईप मशीन आणि १०४ सिमकार्ड जप्त करण्यात आले.

तपासात आरोपी विविध बँक खाते ७ ते ८ हजार रुपयांना विकत घेत होते आणि ती खाती अ‍ॅक्टिव्हेट करून सायबर फ्रॉडसाठी पुढे पाठवत होते, हे स्पष्ट झाले.

तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती

लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण केल्यानंतर एकूण ९४३ बँक खाते आढळून आली. त्यापैकी १८१ खाते थेट सायबर फ्रॉडसाठी वापरले गेले होते. यावर आधारित सायबर नियंत्रण कक्षाला ३३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात मुंबईतील १६ तक्रारींपैकी १४ गुन्हे, महाराष्ट्रातील ४६ तक्रारींपैकी १२ गुन्हे आणि इतर राज्यातील २७७ तक्रारींपैकी ३३ गुन्हे दाखल झाले आहेत.

या खात्यांतून मुंबईतील १.६७ कोटी रुपये, महाराष्ट्रातील १०.५७ कोटी रुपये आणि देशभरातून तब्बल ६०.८२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबवली.

vivek

Recent Posts