मुंबई

Mumbai BMC Election : मुंबईत महायुतीत ‘मिठाचा खडा’! भाजपला दिलेला ‘एबी फॉर्म’ परत घेण्याची नामुष्की; शीव-कोळीवाड्यात शिंदे सेनेची सरशी

Mumbai BMC Election Latest News : धारावीत रवी राजांच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचाच तीव्र विरोध; घाटकोपरमध्ये प्रकाश मेहता नाराज?

मुंबई | मुंबईत महायुतीचे जागावाटप जाहीर झाले असले, तरी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील स्थानिक वाद मिटण्याचे नाव घेत नाहीत. विशेषतः शीव-कोळीवाडा आणि धारावी परिसरात कार्यकर्त्यांच्या रोषामुळे नेत्यांची मोठी गोची झाली आहे. प्रभाग क्रमांक 173 मध्ये तर भाजपने आपल्या उमेदवाराला दिलेला एबी फॉर्म शिवसेनेच्या दबावामुळे परत घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रभाग 173: केळूसकर विरुद्ध कांबळे संघर्षात भाजपची माघार

शीव-कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक १७३ वरून महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हा प्रभाग महिला गटासाठी राखीव झाल्याने शिंदे गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आपल्या पत्नीसाठी मोर्चेबांधणी केली होती. दुसरीकडे, भाजपचे दत्ता केळूसकर यांनीही पत्नीसाठी दावा केला होता. भाजपने सुरुवातीला केळूसकर यांना एबी फॉर्म दिला, मात्र शिवसेनेने यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर भाजपला तो फॉर्म परत घ्यावा लागला. अखेर मध्यरात्री शिवसेनेने रामदास कांबळे यांच्या पत्नीला एबी फॉर्म दिला असून आज त्या अर्ज भरणार आहेत.

धारावीत रवी राजांविरुद्ध ‘स्थानिक’ भाजप आक्रमक

काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले दिग्गज नेते रवी राजा यांना भाजपने धारावीतील प्रभाग १८५ मधून उमेदवारी दिली आहे. मात्र, ‘बाहेरचा उमेदवार नको’ अशी भूमिका घेत धारावीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट दादर येथील भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने केली. कार्यकर्त्यांच्या या विरोधामुळे रवी राजा यांना एबी फॉर्म मिळण्यास सोमवारी सायंकाळपर्यंत विलंब झाला. अखेर रात्री उशिरा त्यांना फॉर्म देण्यात आला असून ते आज अर्ज दाखल करतील.

घाटकोपरमध्ये ‘राखी जाधव’ प्रवेशाने प्रकाश मेहता नाराज?

घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात अस्वस्थता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्रकाश मेहता हे या निर्णयामुळे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राखी जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास मेहता समर्थकांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेवटच्या दिवशी बंडखोरीचे सावट

महायुतीमध्ये 90-137 असा फॉर्म्युला ठरला असला तरी, कार्यकर्त्यांमधील हा सुप्त संघर्ष मतदानापर्यंत निवळणार की बंडखोरीच्या रूपात बाहेर येणार, हा प्रश्न कायम आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांचे काम करण्यास इच्छुक नसल्याचे चित्र दिसत आहे.

vivek

Recent Posts