MNS -Shivsena : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही ‘पलावा पूल’ अपूर्णच! ठाकरे गट आणि मनसेचे एकत्रित आंदोलन, आश्वासनांचे फुगे फोडले

MNS -Shivsena : ‘गाजरे दाखवायचे थांबा, पूल सुरू करा’ – दीपेश म्हात्रेंची शिंदे गटावर उपरोधिक घणाघाती टीका
डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावर सात वर्षांपासून रखडलेल्या पलावा पुलाने आता केवळ ट्राफिकच नाही, तर जनतेच्या संयमालाही तडा दिला आहे.MNS -Shivsena Dombivli News या रखडलेल्या पुलाच्या विरोधात शनिवारी ठिणगी पडली आणि दोन्ही विरोधी राजकीय पक्षांचे नेते एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे Dipesh Mahtre व मनसेचे माजी आमदार राजू पाटील Raju Patil हे एका व्यासपीठावर आले आणि पुलाच्या अपूर्ण कामाचा जाहीर निषेध केला. शेकडो कार्यकर्त्यांच्या गर्दीत ‘पूल हवा, आश्वासनं नको!’ अशा घोषणा घुमल्या.
दीपेश म्हात्रे यांनी उपहासात्मक पद्धतीने ‘पूल उद्घाटन निमंत्रण’ तयार करून शिंदे गटातील आमदार राजेश मोरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं, “पलावा पूल म्हणजे आश्वासनांचा पुतळा झाला आहे – तो पाहायलाच उभा, पण कधीच वाहतुकीसाठी खुला झाला नाही.
आमदार राजेश मोरे यांनी यापूर्वी 31 मेपर्यंत पूल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तो मुदतही ओलांडली आणि पुलाचे काम मात्र तसंच राहिलं. यामुळे आंदोलनकर्त्यांनी जोरदार रोष व्यक्त केला.
राजू पाटील यांनीही थेट शब्दांत सांगितले,”ही कुठल्याही पक्षाविरोधात लढाई नाही. ही सामान्य जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा संपवण्यासाठीची चळवळ आहे.” त्यांनी शिंदे गटाच्या विकासाच्या दाव्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली.
पलावा चौकातील दुकाने हटवण्याच्या वादामुळे पूल रखडत आहे, हे सर्वश्रुत असलं तरी, त्याचा भुर्दंड मात्र प्रवाशांनाच बसतोय.दररोजच्या वाहन कोंडीत तासन्तास अडकणाऱ्या नागरिकांना आता ‘गाजरं’ नको, तर कृती हवी आहे
या आंदोलनामुळे स्थानिक राजकारणात खदखद उफाळून आली असून आगामी काळात प्रशासनावर त्वरित निर्णय घेण्याचा दबाव आणला गेला आहे.
“पूल म्हणजे घोषणा नव्हे, तो हक्क आहे. तो पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही!” – दीपेश म्हात्रे (शिवसेना ठाकरे गट)
“रस्त्यावरची लढाई ही जनतेच्या न्यायासाठीची आहे, ना की राजकारणासाठी.” – माजी आमदार राजू पाटील (मनसे)


