Chandrashekhar Bawankule : “कार्यकर्त्यांचे मोबाईल, व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत!”

•मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक विधान; ‘चुकीचे बटण दाबले तर पुढच्या 5 वर्षांचा सत्यानाश होईल’, बंडखोरांना इशारा
भंडारा :- राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा देताना म्हटले की, “सर्वांचे मोबाईल आणि भंडाऱ्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप्स सर्व्हेलन्सवर टाकले आहेत.”
भाजपच्या वतीने आयोजित कार्यकर्ता दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोरी करू पाहणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत दम भरला.
‘एक चुकीचं बटण, 5 वर्षांचा सत्यानाश’
बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत गंभीर इशारा दिला. ते म्हणाले, “तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचं नुकसान होईल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी तमाशा करतो, चुकीचं मत व्यक्त करतो. मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली, तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील.”
ते पुढे म्हणाले, “तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे चुकीचं बटण दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका.”
‘कोण काय बोलतंय, यावर लक्ष’
सर्व्हेलन्सबाबत अधिक स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले, “सर्वांचे मोबाईल फोन सर्व्हेलन्सवर टाकले आहेत. सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलतंय, त्यावर लक्ष आहे.”
यावेळी बावनकुळे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच, सरकारच्या कामाचा बट्ट्याबोळ होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयार, माजी राज्यमंत्री व आमदार परिणय फुके यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


