
Minakshi Shinde Latest News : संघर्षाला यश! भूषण भोईरांचा पत्ता कट, विक्रांत वायचळ रिंगणात; दिघे साहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात
ठाणे | ठाण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या समर्थकासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी ठरला आहे. प्रभाग क्रमांक 19 मधून स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार या वादात मिनाक्षी शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर, पक्षाने विक्रांत वायचळ यांची उमेदवारी निश्चित केली. आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन मिनाक्षी शिंदे यांनी प्रचाराचा नारळ फोडला.
फितुरांवर सडकून टीका
प्रचाराला सुरुवात करताना मिनाक्षी शिंदे यांनी अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आपलेच लोक आपल्याला पाडण्यासाठी खूप प्रयत्न करतील. शंभरांची गर्दी जमवून त्यातील फितुरांसोबत राहण्यापेक्षा दोन कट्टर लोकांना घेऊन लढाई देणे ही मोठी जबाबदारी असते. संघर्ष करताना फितूर जेव्हा जवळ असतात तेव्हा वाट अधिक कठीण होते, पण कार्यकर्ता अशा अडथळ्यांना कधीच घाबरत नाही.”
संघर्षातून मिळालेली उमेदवारी
या प्रभागात स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष पत्करून भूषण भोईर यांना उमेदवारी दिली जात होती. त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या विक्रांत वायचळ यांना पक्षाने निलंबितही केले होते. मात्र, मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि परिस्थितीची जाणीव करून दिली. अखेर एकनाथ शिंदे यांनी आपली चूक सुधारत वायचळ यांना उमेदवारी जाहीर केली. “नेत्याचे काम कार्यकर्त्यांना बळ देणे आहे आणि साहेबांनी तेच केले,” असे मिनाक्षी शिंदे यांनी नमूद केले.
‘धनुष्यबाण’ रोखण्यासाठी विरोधकांची एकी
मिनाक्षी शिंदे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “सध्या अपक्ष, आपलेच लोक आणि इतर पक्षांनी एकी केली आहे. त्या सर्वांचे एकच ध्येय आहे की शिवसेनेचा धनुष्यबाण या प्रभागात निवडून येऊ नये. पण जेव्हा लढाई मोठी असते तेव्हाच जिंकण्यात मजा येते. माझ्यासारखी स्त्री लढूनच इथपर्यंत आली आहे, त्यामुळे या आव्हानांना आम्ही पुरून उरू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी दिशा, नवी उमेद
धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडून मिळालेली प्रेरणा आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही नव्या उमेदीने या प्रचार फेरीत उतरणार आहोत. प्रभागात आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे, त्यामुळे लोक नक्कीच आमच्यावर आणि धनुष्यबाणावर विश्वास ठेवतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.


