
Maratha Reservation Latest Update : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांचा फौजफाटा तैनात; आंदोलक मात्र ‘मुंबई सोडणार नाही’ भूमिकेवर ठाम
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मुंबईत आंदोलन करत असलेले मराठा आंदोलक आणि प्रशासन यांच्यातील तणाव आता वाढत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर, पोलिसांनी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकात तळ ठोकून असलेल्या आंदोलकांना बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलकांना परिसर खाली करण्याची सतत सूचना केली जात आहे.
पोलिसांचे आवाहन, ‘बळाचा वापर करणार नाही’
सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कटारे यांनी सांगितले की, “आम्ही आंदोलकांना विनंती करत आहोत. कोणत्याही प्रकारच्या बळाचा वापर केला जाणार नाही. आमच्या कोणाच्याही हातात लाठ्या नाहीत.” प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर करण्याची परवानगी आहे, मात्र स्थानकात थांबू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि गृहरक्षक दलाचे जवान संपूर्ण स्थानक परिसरात तैनात करण्यात आले आहेत.
आंदोलकांचा निर्धार कायम
एकिकडे पोलीस स्थानक परिसर खाली करण्याचे आवाहन करत असताना, दुसरीकडे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. “आम्ही मुंबई सोडून जाणार नाही,” असा निर्धार अनेक आंदोलकांनी व्यक्त केला आहे. एका आंदोलकाने सांगितले, “ही मुंबई आमची आहे, मराठी माणसाची आहे. आम्हाला स्थानक परिसरातून काढले तरी आम्ही अन्य ठिकाणी राहू, पण मुंबई सोडणार नाही.”
उच्च न्यायालयाने आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले असले, तरीही राज्याच्या विविध भागांतून आंदोलकांचा ओघ सुरूच असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि आंदोलकांमध्ये पुढील काळात काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


