Acharya Devrat : आता ‘राजभवन’ नव्हे, ‘लोकभवन’! – राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राजभवनचे नामकरण

•केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अधिकृत बदल; राजभवन आता लोकाभिमुख संवाद आणि सहभागाचे केंद्र बनणार
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात एक महत्त्वाचा बदल म्हणून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला तात्काळ निर्देश दिले आहेत.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हा निर्णय अत्यंत दिशादर्शक असल्याचे सांगितले. ‘लोकभवन’ असे नामकरण केल्यामुळे राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
लोकाभिमुखतेवर भर
राज्यपाल यांनी या बदलामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आता ‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहता, ते राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद व सहभाग यांचे एक केंद्र बनले पाहिजे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोककल्याणासाठी राजभवन आता सक्रिय भूमिका घेणार आहे.


