Kargil Vijay Diwas: “कारगिल विजय दिन” – शौर्य, बलिदान आणि अभिमानाचा अमर दिवशी भारत वीर जवानांना सलाम

Kargil Vijay Diwas: पाकिस्तानच्या घुसखोरीचा शौर्याने प्रतिकार करत भारताने 5600 मीटर उंच शिखरांवर पुन्हा फडकवला राष्ट्रध्वज
Kargil Vijay Diwas: आज 26 जुलै, संपूर्ण देशभरात ‘कारगिल विजय दिवस’ मोठ्या अभिमानाने आणि कृतज्ञतेने साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी 1999 साली भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानला निर्णायक पराभव देत आपल्या मातृभूमीच्या सीमा अबाधित ठेवल्या. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि समर्पणाची साक्ष देणारा हा दिवस देशवासीयांसाठी राष्ट्रीय अभिमानाचा पर्व आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांनी आज दिल्लीतील अमर जवान ज्योती येथे शहीद जवानांना आदरांजली वाहिली. तसेच लेह, द्रास आणि कारगिलमध्येही विविध श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कारगिल युद्ध – शिखरांवर लढलेले हे भारताच्या शौर्याचे युद्ध
1999 साली मे महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानच्या घुसखोर सैनिकांनी आणि दहशतवाद्यांनी भारतीय नियंत्रण रेषा ओलांडून कारगिलच्या पर्वतीय भागात बेकायदेशीर कब्जा केला. त्यांनी टायगर हिल, तोलोलिंग, प्वाइंट 4875 यांसारख्या उंच शिखरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
या धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या शिखरांवर नियंत्रण मिळवणे म्हणजे संपूर्ण लेह-लडाख दळणवळण व्यवस्था कोलमडवण्याचा कट होता. पण भारतीय सैन्याने “ऑपरेशन विजय” अंतर्गत या सर्व घुसखोरींचा जोरदार प्रतिकार केला. अत्यंत प्रतिकूल हवामानात, कमी ऑक्सिजन आणि उणे तापमानातही भारतीय जवानांनी 5600 मीटर उंचीवरही युद्ध करून विजय मिळवला.
या युद्धात 527 भारतीय जवान शहीद, तर 1363 हून अधिक जखमी झाले. कॅप्टन विक्रम बत्रा, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, राइफलमन संजय कुमार यांसारख्या अनेक शूरवीरांना परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सांगितले की, “कारगिल विजय दिवस हे फक्त एक युद्धजिंकल्याचे प्रतीक नाही, तर ते आपल्या सैन्याच्या अपार साहसाची, त्यागाची आणि मातृभूमीवरील श्रद्धेची गाथा आहे. आपण या शूरवीरांना सदैव स्मरूया.”



