
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : आझाद मैदानातून हटणार नाही, शांततेला धोका दिल्यास परिणाम भोगावे लागतील; पोलिसांच्या अटकेलाही भीक नाही
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आज राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजावर अन्याय केल्यास त्यांच्या मनात बदला घेण्याची भावना निर्माण होईल, असा थेट इशाराही जरांगे पाटलांनी दिला.
‘तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावली तर ते घातक ठरेल’
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “राज्य सरकारने एखाद्या समाजावर अन्याय होईल, असे वागू नये. तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकावून लावू नका. तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली, तर ते घातक असेल. आमच्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केला तर ते अतिघातक ठरेल. तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल.”
सरकारने कितीही भीती घातली तरी आपण घाबरणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, “आम्ही मराठ्यांची औलाद आहोत. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहू द्या. मी जे जे बोलतो, ते ते होत असतं.”
शांततेचे आवाहन आणि सरकारवर टीका
जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. “सरकार जास्तीत जास्त काय करेल? 100 किंवा 1 लाख पोलीस आले तरी अटक करून तुरुंगातच नेतील. आम्ही तुरुंगातही उपोषण करू. पण आता सरकारला सुट्टी नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सर्व गाड्या काढून टाकल्या आहेत आणि आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नाही, असे सांगत त्यांनी आपण कायद्याचे पालन करत असल्याचा दावा केला. “राज्य सरकारने नको त्या विषयात घुसू नये. आम्हाला आझाद मैदानातून हाकलवून देण्याच्या वल्गना बंद करा,” असे ते म्हणाले. “मी मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. मराठा काय असतात, हे 350 वर्षांनी पुन्हा बघायचं असेल, तर माझा नाईलाज आहे,” अशा आक्रमक शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला.



