Manoj Jarange Patil : ‘मी मरण पत्करायला तयार, पण मागे हटणार नाही’; आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Manoj Jarange Patil On Maratha Samaj : समाजाचं नाव खाली जाईल, असं कुणीही वागू नका’; जरांगेंनी दिला शांततेचा संदेश
मुंबई: मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी काढलेला मोर्चा अखेर मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचला आहे. मुंबईत पोहोचताच जरांगे पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना शांततेचे आणि शिस्तीचे आवाहन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्यांनी कडक शब्दांत सूचना दिल्या.
आझाद मैदानावर जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, “कोणीही जाळपोळ किंवा दगडफेक करायची नाही. आंदोलनाला बट्टा लागणार नाही याची काळजी घ्या. मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटणार नाही.”
‘विजय मिळाल्याशिवाय इथून हालायचं नाही’
जरांगे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत कार्यकर्त्यांना सांगितले, “मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही. सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे, आता आपणही सरकारला सहकार्य करावे.”
कोणत्याही व्यक्तीने चुकीच्या मार्गाने वागू नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. “दारू पिऊन धिंगाणा घालू नका. माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल, असे कोणीही वागू नये. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही,” असे ते म्हणाले.
‘राजकीय पोळी भाजणाऱ्यांपासून सावध रहा’
राजकीय नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत जरांगे पाटील म्हणाले, “कोण काय सांगत आहे, कोण राजकीय पोळी भाजत आहे, कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करत आहे का, हे गांभीर्याने पाहा.”
शेवटी, त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. “दोन तासांत मुंबई मोकळी करून द्या, पोलिसांना सहकार्य करा. एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या,” असे म्हणत त्यांनी आपल्या शिस्तबद्ध आंदोलनाचा संदेश दिला.



