Sanjay Raut : पोलिस यंत्रणा आणि ईडीवर राजकीय दबाव ; महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची गंभीर स्थिती – संजय राऊत”

Sanjay Raut News : धुळे प्रकरणात पाच कोटी सापडले, पण ईडी पोहोचली नाही – राऊतांचा सवाल”,फडणवीस अर्जुन खोतकर यांना वाचवतायत का? – मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप”
मुंबई :- शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राज्यातील पोलिस यंत्रणा, महिला आयोग आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस ठाण्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे, विशेषतः हुंडाबळी आणि महिला अत्याचाराच्या प्रकरणांची योग्य चौकशी होत नसल्याची टीका त्यांनी केली.
राऊत यांनी धुळे येथे सापडलेल्या पाच कोटी रुपयांच्या प्रकरणाकडे लक्ष वेधत विचारले की, “ईडीने विरोधकांवर तत्काळ कारवाई केली असती, पण सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत ईडी गप्प का आहे?” त्यांनी हेही म्हटले की, “ईडी ही मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाली आहे.”
या प्रकरणात विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या पीएकडे मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली असताना, केवळ SIT स्थापन करण्यात आली, गुन्हा दाखल झाला नाही, आणि ईडीकडे तपास सोपवण्यात आलेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर संशय व्यक्त करत विचारले की, “देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत का? अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित कोणते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे का?”
राऊत यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, “पाच कोटी रुपये ही तर सुरुवात होती. यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्याचे टार्गेट दिले गेले होते. आरोपीने साडेपाच कोटी रुपयांची बॅग घेऊन पलायन केले.” या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


