मुंबई

Maharashtra Winter Session : ‘संविधान अपमान’ मुद्द्यावरून अधिवेशनाचा बार भडकला! – महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन पहिल्यांदाच ‘विरोधी पक्षनेत्यां’विना सुरू

Maharashtra Winter Session : चहापानावर बहिष्कारानंतर महाविकास आघाडी आक्रमक; “विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न,” नेत्यांचा घणाघात; सात दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची अपेक्षा

नागपूर :- महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला Maharashtra Winter Session आज (8 डिसेंबर) पासून नागपुरात सुरुवात झाली. मात्र, यंदाच्या अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच राजकीय वादळाला तोंड फुटले आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवत कामकाज सुरू झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर संविधानाचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडीचा कोणताही उल्लेख नसल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला.

यावेळी विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा “संविधानाचा अपमान” असल्याचे म्हटले. तसेच, “सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे,” असा घणाघात त्यांनी केला. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी सतेज पाटील आणि शिवसेना (ठाकरे गट) कडून विधानसभेसाठी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र देण्यात आले असले तरी, पदाची निवड झालेली नाही.

सात दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात आज पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. राज्यातील शेतकरी, तसेच विदर्भातील जनतेला या अधिवेशनातून मोठ्या घोषणांची आणि प्रश्नांवर तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने, पुरवणी मागण्यांमध्ये काही नवीन लोकप्रिय घोषणा होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

vivek

Recent Posts