
Keshav Upadhyaya On Uddhav Thackeray : ‘चांगले मित्र गमावणे हा विश्वासघात’; उपाध्ये यांचा ठाकरेंना टोला, म्हणाले ‘हे ट्रम्प आणि ते पिपाण्या’
मुंबई :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आपण भारत आणि रशियाला चीनच्या हाती सोपवले,’ असे विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वाक् युद्ध सुरू झाले आहे. भाजप नेते केशव उपाध्ये Keshav Upadhyaya यांनी याच वाक्याचा संदर्भ देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
उपाध्ये यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “चांगले मित्र गमावणे हा विश्वासघात, अरेरावी आणि मुजोरीचा अंतिम टप्पा असतोच.” याच धर्तीवर महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच वाक्य बोलत असल्याचे ते म्हणाले.
‘मातोश्री’चा मान गेला, आता गांधींच्या मातोश्रीचा मान राखायला जातात
उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या भाजपसोबतच्या युती तोडण्यावरही टीका केली. “उबाठाची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरेरावी अनेकवेळा सहन करत, सन्मान देऊनही मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत विश्वासघात केला,” असा आरोप त्यांनी केला.
उपाध्ये पुढे म्हणाले, “आता सगळेच गमावून काँग्रेसचे अंकित होऊन बसले आहेत. भाजपच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ला असणारा मान आता गेला. आता राहुल गांधींच्या मातोश्रीचा मान राखायला उद्धव ठाकरे दिल्लीला जातात.”
आपल्या पोस्टच्या शेवटी उपाध्ये यांनी ट्रम्प आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करत म्हटले की, “ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’… एवढाच काय तो फरक!!” या टीकेमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.


