Maharashtra Rain Alert: कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा कहर; रायगड-रत्नागिरीत अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : राज्यात 4 ते 10 जुलैदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पावसाचा हवामान विभागाचा इशारा
मुंबई | महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून कोकण व पश्चिम घाट परिसराला याचा सर्वाधिक तडाखा बसत आहे. रत्नागिरी, रायगड, पुणे घाट परिसर आणि सातारा घाटात हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. Maharashtra Latest Rain Update
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कोकणात जोर धरला असून, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका आणि जगबुडी नद्यांनी पाण्याची इशारा पातळी पार केली आहे. यामुळे रोहा, कोलाड, खेड, वाकण व खारघाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे व सातारा घाट परिसरातही मुसळधार पावसाने जोर धरला असून, या भागांमध्ये गुरुवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रातही पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. परिणामी, धोक्याची पातळी गाठणाऱ्या नद्या आणि नाल्यांमुळे काही गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील आठवड्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र सोमवारपासून कोकणात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर विशेषतः जास्त आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या जैसलमेर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यामुळे आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
4 ते 10 जुलैदरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण, घाटमाथा आणि काही प्रमाणात विदर्भातही अतिवृष्टीचे संकेत आहेत. विशेष म्हणजे शनिवारपासून काही भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.


