मुंबई

Maharashtra Politics : भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी घेतला समाचार!

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे गरजेचे नाही ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी

मुंबई :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथील कार्यक्रमात एक वक्तव्य केले आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी येणे गरजेचे नाही असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी विचारले आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी एक फेसबुक वर पोस्ट करत भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .

देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?

सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?

आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच !

राज ठाकरे पुढे म्हणाले की,महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0