पुणे

Maharashtra Politics : कृषिमंत्री कोकाटेंच्या ‘रम्मी’ प्रकरणावरून राजकारण तापलं: विरोधकांकडून राजीनाम्याची तीव्र मागणी!

•Manikrao Kokate Rummy Controversy अजित पवारांची कोकाटेंना शेवटची ताकीद? म्हणाले, “तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका!”

पुणे :- राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहात ‘जंगली रम्मी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या व्हिडिओमुळे केवळ शेतकरी आणि संघटनांमध्येच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आघाडी उघडली असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर ‘इजा झाली, बिजा झाली, आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका,’ असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कडक शब्दांत ताकीद दिली आहे.

काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते आधीच चर्चेत होते. त्यातच, आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभेतील एक व्हिडिओ माध्यमांसमोर आणला. या व्हिडिओमध्ये कोकाटे सभागृहात मोबाईलवर ‘जंगली रम्मी’ खेळताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडिओने सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री कोकाटे यांनी, “मी राजीनामा देण्यासारखं काहीच केलं नाही. मी सभागृहात रम्मी खेळत नव्हतो, मोबाईलमध्ये जाहिरात आली ती स्कीप करत होतो,” असे म्हटले आहे. मात्र, त्यांचे हे स्पष्टीकरण विरोधकांना पटलेले नाही आणि त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले की, “माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ सभागृहाच्या आत घडल्याने तो विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींच्या अखत्यारित येतो.” आपली आणि माणिकरावांची अद्याप भेट झाली नसून, त्यांची पत्रकार परिषद पाहूनच मला माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “माझी आणि त्यांची बहुतेक सोमवारी (29 जुलै रोजी) बैठक होईल. मला कृषिमंत्री यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी कोकाटे यांनी सरकारला ‘भिकारी’ म्हटले होते. या वादग्रस्त वक्तव्यावरही आपण सोमवारी त्यांच्याशी बोलणार असल्याचे अजित पवारांनी नमूद केले. माणिकराव कोकाटे यांच्या कृषिमंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रितपणे निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली.

“राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे,” असे अजित पवारांनी ठामपणे सांगितले. यापूर्वीही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अशीच एक घटना घडली होती, तेव्हाही आपण त्यांना समज दिल्याचे त्यांनी आठवण करून दिली. “इजा झाली, बिजा झाली, आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका,” असा स्पष्ट इशारा अजित पवारांनी दिला. “माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0