
Maharashtra Vidhan Bhavan Latest News : 2029 पर्यंत विधानभवन परिसरात ‘नो एन्ट्री’; विशेषाधिकार समितीचा मोठा निर्णय, अभ्यागतांची ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ तपासण्याचीही शिफारस
मुंबई :- मुंबईतील विधानभवनाच्या (Maharashtra Vidhan Bhavan) पायऱ्यांवर 17 जुलै 2025 रोजी हाणामारी करून विधिमंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या दोन राजकीय कार्यकर्त्यांना विशेषाधिकार समितीने मोठी शिक्षा सुचवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि भाजपचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांना विधानभवनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल आणि आक्षेपार्ह वर्तनाबद्दल दोन दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस समितीने केली आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखालील विशेषाधिकार समितीने आपला अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर केला. या गंभीर प्रकारामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे समितीने स्पष्ट केले. चौकशीनंतर, समितीने देशमुख व टकले यांना विधिमंडळाच्या विशेषाधिकार भंगाबद्दल दोषी ठरवले.शिक्षेव्यतिरिक्त, या दोघांनाही 2029 पर्यंत मुंबई व नागपूर येथील विधानभवन परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सर्जेराव टकले हे प्रवेशपत्र नसतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत विधानभवनात आले होते, हे समितीपुढे उघड झाले. या गंभीर बाबीची दखल घेत समितीने महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. विधानभवनात येणाऱ्या अभ्यागतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांच्या डेटाबेसशी संलग्न करून तपासली जावी आणि त्यानंतरच प्रवेशपत्र जारी करावे, असे समितीने सुचवले आहे. तसेच, आमदारांनी आपल्या अभ्यागतांची जबाबदारी घ्यावी आणि प्रवेशपत्राशिवाय कोणालाही आत आणू नये, अशी ताकीदही देण्यात आली आहे.


