Maharashtra Political News : बारामती पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! सुनेत्रा पवार रिंगणात, तर पार्थ पवार राज्यसभेवर; राष्ट्रवादी कोअर कमिटीचा मोठा निर्णय

•सुनेत्रा पवार ठरणार बारामतीच्या उमेदवार | 10 मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार | पार्थ पवारांच्या नावावर राज्यसभेसाठी शिक्कामोर्तब
मुंबई :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पोटनिवडणुकीचे गणित आणि घटनात्मक पेच
सुनेत्रा पवार यांनी नुकतीच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र, भारतीय संविधानातील कलम 164(4) नुसार, मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे (विधानसभा किंवा विधान परिषद) सदस्य होणे अनिवार्य आहे. याच घटनात्मक तरतुदीची पूर्तता करण्यासाठी सुनेत्रा पवार बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत.10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी या निवडणुकीची अधिकृत घोषणा करू शकते.
पार्थ पवार जाणार राज्यसभेवर?
मुंबईत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, यावर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब झाले आहे. अजितदादांच्या निधनानंतर तरुण नेतृत्वाला संधी देऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होत आहे.
सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष
केवळ राज्य सरकारमध्येच नव्हे, तर पक्षातही सुनेत्रा पवार यांची ताकद वाढणार आहे. येत्या 26 फेब्रुवारीला वरळी येथील डोममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत निवड केली जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न
अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या या रिक्त जागेवर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनुसार, अशा दुर्दैवी प्रसंगी इतर राजकीय पक्ष उमेदवार उभा न करण्याचे संकेत पाळतात का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



