पुणे

Maharashtra News : राज्यात तिसरीनंतरही हिंदी सक्ती नाही!

Maharashtra Latest News : नवीन अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजीला प्राधान्य; त्रिभाषा सूत्राचा निर्णय लांबणीवर

पुणे :- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी प्रस्तावित केलेला सुधारित अभ्यासक्रम 2025 चा मसुदा नुकताच जाहीर केला आहे. या मसुद्यानुसार, तिसरीनंतरही हिंदीची सक्ती करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश करण्यात आला आहे, तर त्रिभाषा सूत्राचा उल्लेख या मसुद्यात आढळत नाही. त्रिभाषा सूत्र समितीच्या अहवालानंतरच या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. Maharashtra State Board Decision

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) हा प्रस्तावित मसुदा जाहीर केला असून, 27 ऑगस्टपर्यंत यावर अभिप्राय मागवण्यात आले आहेत. इयत्ता तिसरी ते दहावीसाठी तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रम आराखड्यात वीस विषयांचा समावेश आहे. या वीस विषयांमध्ये सद्यस्थितीत मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश प्रामुख्याने दिसतो आहे.

त्रिभाषा सूत्राचा निर्णय समितीच्या अहवालानंतर

शिक्षण विभागाने त्रिभाषा सूत्रसंबंधीचा निर्णय सध्या मागे ठेवला आहे. या संदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतरच, त्रिभाषा सूत्र कोणत्या वर्गापासून लागू करायचे, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

या नवीन आराखड्यात काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षण या स्वतंत्र विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तसेच, इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी ‘परिसर अभ्यास’ या विषयाऐवजी “सभोवतालचे जग” या नव्या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि व्यावहारिक ज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. या सुधारित अभ्यासक्रमावर येणारे अभिप्राय आणि त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल, हे राज्यातील शालेय शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्यात महत्त्वाचे ठरतील.

vivek

Recent Posts