Hasan Mushrif On Mahadevi Elephant : ‘महादेवी’ हत्तीणीच्या परतीसाठी राजकारण तापले; हसन मुश्रीफ यांचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Hasan Mushrif On Mahadevi Elephant : मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वपूर्ण बैठक, जनभावनेचा आदर होणार का?
मुंबई :- कोल्हापूरजवळील नांदणी मठात गेली 33 वर्षे राहिलेल्या ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरात येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवल्यानंतर तिच्या परतीसाठी राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. स्थानिक नागरिकांसह विविध राजकीय नेत्यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून, आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ Hasan Mushrif On Mahadevi Elephant यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
मुश्रीफांचा महादेवीला परत आणण्याचा निर्धार!
मंत्री हसन मुश्रीफ यांनी महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले, “जैन समाजासोबतच सर्वच समाजाच्या भावना या हत्तीणीशी जोडल्या गेल्या आहेत. कालही याच्या निषेधार्थ मोठा मोर्चा निघाला. महादेवीला परत आणण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ आणि त्यासाठी येणारा खर्च कार्यकर्ते करतील.” मुश्रीफ यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून, त्यांनी मंत्रालयात बैठक बोलावल्याची माहिती दिली. “वनतारा प्राणी संवर्धन केंद्राच्या नियमाप्रमाणे आम्ही महादेवीची काळजी घेऊ आणि तिला परत आणू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?
याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आज महादेवी हत्तीणीबाबत मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये जनभावना आणि कायदेशीर बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल.” या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांच्या स्वाक्षरीची मोहीम, मोर्चे आणि राजकीय नेत्यांचा वाढता दबाव यामुळे सरकारवर योग्य तो निर्णय घेण्यासाठी मोठा दबाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा मिरवणुकीसाठी उपयोग केल्याचा आरोप ‘पेटा’ या प्राणी हक्क संघटनेने केला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला गुजरात येथील वनतारा केंद्रात हलवण्याचे आदेश दिले. मठाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु ती फेटाळण्यात आल्याने अखेर महादेवीला गुजरातला हलवण्यात आले.


