महाराष्ट्र

Maharashtra Sarkar : राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय; थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांची ताकद वाढली, आता मतदानाचाही अधिकार!

Maharashtra Cabinet Sarkar News : प्रशासन सक्षम करण्यावर भर; आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार, धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठेंचा भव्य पुतळा उभारणार

मुंबई | राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांपैकी ‘नगरपरिषद अधिनियमातील सुधारणा’ हा राजकीयदृष्ट्या सर्वात मोठा निर्णय मानला जात असून, यामुळे थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आता सभागृहात मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

1.नगराध्यक्ष आता ‘पावरफुल’; मतदानाचा अधिकार बहाल
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार, थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना (अध्यक्ष) आता नगरपरिषदेचे सदस्यत्व तर मिळेलच, शिवाय त्यांना सभागृहातील महत्त्वाच्या निर्णयांवर मतदानही करता येणार आहे. या सुधारणेसाठी सरकार लवकरच अध्यादेश काढणार असून, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगराध्यक्षांची पकड अधिक मजबूत होणार आहे.

2.ग्रामीण प्रशासन सक्षमीकरणासाठी ‘सरपंच संवाद’
सामान्य प्रशासन विभागांतर्गत जिल्हा, तालुका आणि ग्राम स्तरावरील प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘जिल्हा कर्मयोगी २.०’ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासोबतच गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सरपंच संवाद’ हा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3.आरोग्य सेविकांसाठी दिलासादायक निर्णय
राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांसाठी (Bonded ANM) सरकारने सुखद धक्का दिला आहे. या आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या आता नियमित (Regularize) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

4.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा,धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीची दखल घेत मंत्रिमंडळाने दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा पुतळ्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत या जमिनीचे हस्तांतरण केले जाणार असून यामुळे धाराशिवकरांची मोठी मागणी पूर्ण झाली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago