ठाणेमुंबई

Maharashtra Election : महाराष्ट्रात आज महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?

Maharashtra Muncipal Corporation Election Latest News : राज्य निवडणूक आयोग आज दुपारी 04.00 वाजता पत्रकार परिषदेत तारखा जाहीर करण्याची शक्यता; 3 टप्प्यांत निवडणुकीची योजना

मुंबई :- राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज (4 नोव्हेंबर, मंगळवार) राज्य निवडणूक आयोगाने दुपारी 04.00 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे, ज्यात या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील या निवडणुका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे स्पष्ट निर्देश सरकारला दिले आहेत. या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची योजना आखली आहे. यात सुरुवातीला नगर परिषदा आणि नगर पंचायती, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे आणि सर्व पक्ष आपापल्या स्तरावर तयारीला लागले आहेत. विरोधी पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवरून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती, मात्र आयोगाने ही मागणी फेटाळल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग कोर्टाने दिलेल्या वेळेत निवडणुका घेण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे.

आज दुपारी 04.00 वाजता निवडणूक आयोग नेमकी कोणती घोषणा करतो, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल, आचारसंहिता कधी लागू होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0