
Cabinet Meeting : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही आर्थिक विकास महामंडळांना मान्यता; शेतकऱ्यांसाठीही भरघोस निधी
मुंबई :- राज्यात गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तासांतच राज्य सरकारने तब्बल 220 हून अधिक शासन निर्णय (GR) जारी करण्याचा विक्रम केला आहे. या निर्णयांमध्ये महापालिकांसह नगर परिषद आणि नगर पंचायतींवर मोठ्या प्रमाणात निधीची मुक्त उधळण करण्यात आली आहे.
निधीचा पाऊस आणि धडाधड निर्णय
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. तसेच, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 187 कोटी 98 लाख रुपयांचा निधी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीसाठी बियाणे खरेदीला 3 हजार 499 कोटी 84 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींना विशिष्ट नागरी सुविधांसाठी पाच कोटी रुपयांपासून ते दहा कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय, ब्राह्मण समाजासाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळ, राजपूत समाजासाठी स्थापन केलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी स्थापन केलेल्या श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना राबवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. बदल्या, नियुक्त्या, प्रतिनियुक्त्त्या आणि शासकीय तंत्रनिकेतनास मान्यता देण्याचे शासन निर्णयही धडाधड जारी करण्यात आले.
कॅबिनेट बैठकीतील 21 महत्त्वाचे निर्णय
4 नोव्हेंबर रोजी निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित 21 महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये जनविश्वास अध्यादेशाला मान्यता, नवी तंत्रनिकेतन आणि मच्छीमारांच्या कर्जावर व्याजसवलत यासह विविध घोषणांचा धडाका लावला गेला.
निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आजपासून (4 नोव्हेंबर 2025) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत वेळापत्रक जाहीर केले. यानुसार,10 नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख असेल. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल, तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.


