Jayant Patil: “ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम” – जयंत पाटलांच्या भाषणातून राष्ट्रवादीत नवे संकेत!
Jayant Patil: शरद पवारांचा निर्णय अंतिम – जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य, नवीन नेतृत्वाच्या शक्यतेला उधाण
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी पक्षाच्या अंतर्गत घडामोडी आणि राजकीय दिशेला अनुसरून केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. “मला शरद पवार साहेबांनी सात वर्षांचा मोठा कालावधी दिला, पण आता पक्षाला नव्या चेहऱ्यांची गरज आहे,” असे म्हणत त्यांनी सूचित केले की नेतृत्वात बदल होण्याची शक्यता असू शकते. “शेवटी हा पक्ष शरद पवार साहेबांचा आहे. त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
जयंत पाटलांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या योगदानाची आणि देशहितासाठी घेतलेल्या भूमिका यांची स्तुती करत म्हटले, “शत्रूला उत्तर देण्याची वेळ आली की देश एकसंघ असतो, आणि शरद पवारांनी हे कायमच दाखवून दिले आहे.”
राजकीय निष्ठा आणि संघर्षाबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. “2014 नंतर बरेच लोक पक्ष सोडून गेले, पण तुम्ही सगळे पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात, हीच खरी शक्ती आहे,” असे ते म्हणाले.
त्यांच्या भाषणातील सर्वाधिक लक्षवेधी विधान म्हणजे – “ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम यांच्यातली आहे. आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत.” हे विधान सत्ताधाऱ्यांविरोधातील स्पष्ट आणि धारदार भूमिकेचे प्रतिक ठरले आहे.
जयंत पाटलांचे हे भाषण केवळ कार्यकर्त्यांना उद्देशून नव्हते, तर पक्षाच्या नेतृत्वात आणि रणनीतीत काही मोठा बदल येऊ शकतो, याची चाहूल देणारे होते.


