मुंबई

Maha Vikas Aghadi : दक्षिण मुंबईचा सातबारा धनिकांच्या नावावर नाही’: आंदोलनाविरोधात देवरांच्या पत्रावर राजकीय वर्तुळातून संताप

Maha Vikas Aghadi On Milind Deovra : संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांकडून जोरदार टीका

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, यापुढे दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या नेत्यांनी देवरांवर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

नेत्यांच्या प्रतिक्रिया

संजय राऊत (शिवसेना, ठाकरे गट): “दक्षिण मुंबईचा सातबारा या धनिकांच्या नावावर केलेला नाही. मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकवटला, याची पोटदुखी उघड झाली आहे.” देवरांच्या मागणीवरून राऊत यांनी शिंदे गटावर थेट निशाणा साधला.

रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट): आमदार रोहित पवार यांनी या पत्रावरून शिंदे गट आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “हे पत्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं आहे. गृह विभाग झोपला होता का? असा प्रश्न या पत्राच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. आंदोलनाला किती लोक येणार होते, याची माहिती गृह विभागाकडे नव्हती का? अशी माहिती असूनही ती लपवण्यात आली, बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिली नाही.” रोहित पवार यांनी पुढे म्हटले, “या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून गृह विभागाचे राजकीयदृष्ट्या कपडे काढत आहेत.”

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट): आव्हाड यांनीही देवरांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आंदोलनाचा हक्क संविधानाने दिला आहे. त्याचा वापर लोकशाहीमध्ये केला जातो. या हक्कावरच बंदी घालण्याची मागणी करणे चुकीचे आहे,” असे त्यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सलग पाच दिवस उपोषण केले होते, ज्याला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक राज्यातून मुंबईत दाखल झाले होते. यामुळे मुंबईत काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर देवरा यांनी ही मागणी केली असून, यावरून आता राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago