
Mumbai Latest Rain Update : क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू; एनडीआरएफ आणि पालिका पथके सज्ज
मुंबई :- मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीतील पाण्याची पातळी धोकादायक पातळीच्या जवळ पोहोचली आहे. नदीची धोकादायक पातळी 3.40 मीटर असून, मंगळवारी ती 3.10 मीटरवर पोहोचल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विहार तलाव भरल्याने धोका वाढला
सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवईतील विहार तलाव पूर्ण भरून वाहू लागला आहे. यामुळे मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठी नदीतील पाणी पातळी लवकरच 3.40 मीटरची धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि वांद्रे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांचे स्थलांतर सुरू
संभाव्य धोका टाळण्यासाठी, मिठी नदीच्या काठावर असलेल्या क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील सुमारे 140 कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) आणि पालिकेची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. या कुटुंबांना जवळच्या मगनलाल नथूराम शाळेत हलवण्यात येत असून, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोयही करण्यात आल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


