
Lok Sabha Session Latest News : इंधन दरवाढ आणि आखाती युद्धावरून विरोधकांचा संसदेत गदारोळ; सभापती ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर 10 तासांची प्रदीर्घ चर्चा
ANI :- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस प्रचंड गदारोळाचा ठरला. इराण-अमेरिका युद्धाचे सावट आणि देशांतर्गत वाढत्या इंधन दरवाढीवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘नरेंदर-सरेंडर’ अशा घोषणांनी लोकसभा दणाणून सोडली. इंधन संकट आणि जागतिक परिस्थितीवर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासात मोठा गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
सध्या संसदेत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर महत्त्वाची चर्चा सुरू आहे. विरोधकांचा आरोप आहे की सभापती पक्षपातीपणे काम करत असून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेची सुरुवात करताना सांगितले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाषणादरम्यान वारंवार रोखले जाते. या प्रस्तावावर एकूण 10 तास चर्चा होणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सभागृहाला संबोधित करून सरकारची बाजू मांडणार आहेत.
संसदेत राजकीय संघर्ष टोकाला
पोहोचलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. केरळ आणि तामिळनाडूमध्ये सुमारे 16,450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. केरळमधील एर्नाकुलम येथे 10,800 कोटींचे प्रकल्प आणि तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 5,650 कोटींचे प्रकल्प जनतेला समर्पित केले जाणार आहेत. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि विशेषतः इंधन क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
तामिळनाडूतील दौऱ्यादरम्यान
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट करत द्रमुक (DMK) सरकारवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूमध्ये एनडीएची वाढती लोकप्रियता पाहून द्रमुक पक्ष चिंतेत असल्याचा दावा त्यांनी केला. पहिल्या टप्प्यात केरळमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी विविध सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावली असून, सायंकाळी ते तामिळनाडूतील जनतेला संबोधित करणार आहेत. संसदेतील अविश्वास प्रस्ताव आणि पंतप्रधानांचा हा दक्षिण दौरा, या दोन्ही घटनांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.



