
Anjali Damania On Girish Mahajan : हा व्यवहार क्रिमिनल कोर्टात रद्द झाला पाहिजे;” दमानियांचा थेट सरकारला इशारा; अजित पवार, शीतल तेजवानींसह पार्थ पवारांवरही कारवाईची मागणी
मुंबई :- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया Anjali Damania यांनी मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आज काही गंभीर आरोप करत थेट सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला. विशेषतः मंंत्री गिरीश महाजन Girish Mahajan यांच्याबद्दल बोलताना त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
गिरीश महाजनांवर थेट टीका
नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून बोलताना दमानिया यांनी म्हटले, “एवढा विरोध होत आहे तरी गिरीश महाजनांना एवढी मस्ती आहे की, त्यांनी नाशिकची झाडे तोडली. ‘लोकांनी आंदोलन करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार’ असे ते आहेत. गिरीश महाजन यांना लक्षात ठेवा… राजकारणातून यांना फेकून द्या,” असे थेट आवाहन अंजली दमानिया यांनी केले. Anjali Damania on Girish Mahajan
मुंढवा जमीन घोटाळ्यावर गंभीर आक्षेप
मुंढवा जमीन घोटाळा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे सांगत त्यांनी पुणे कोर्टात झालेल्या घडामोडींवर आक्षेप घेतला.”पुणे कोर्टात कलेक्टरतर्फे सेल डीड कॅन्सल (विक्रीपत्र रद्द) करण्याचा अर्ज दाखल करण्यात आला. माझी भीती खरी ठरली. ही जमीन सरकारची आहे, वतनाचे लोक आणि शीतल तेजवानी यांचे नाव आहे फक्त. हा व्यवहार फक्त रद्द केला जातोय, कारवाई न करता, हे चुकीचे आहे.” “हा व्यवहार सिव्हिल (दिवाणी) कोर्टात नाही तर क्रिमिनल (गुन्हेगारी) कोर्टात रद्द झाला पाहिजे. कारवाई होऊन व्यवहार रद्द व्हावा,” अशी मागणी त्यांनी केली.
हिवाळी अधिवेशन आणि विरोधी पक्षावर नाराजी
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष गदारोळ करताना दिसत नाही याबद्दल दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “विरोधी पक्षाला विनंती आहे रे बाबा काहीतरी प्रश्न विचारा. हिवाळी अधिवेशनाला काय म्हणावं हेच समजत नाही. कोणीही येत काहीही विधान करते. फॅशन शो आहे का? बुद्धीची पातळी दिवाळखोरी म्हणावं हेच समजत नाही. महाराष्ट्राची व्हिलेवाट लागेल,” असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
पार्थ पवार आणि श्वेतपत्रिकेची मागणी
अंजली दमानिया यांनी या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरही कारवाईची मागणी केली. “मी कोणालाच सोडणार नाही. एफआयआरमध्ये पार्थ पवारचे नाव आले पाहिजे. अजित पवार, शीतल तेजवाणी कोणालाच वाचवू नका. क्रिमिनल लायबिलिटी आहे, फ्रॉड झाले त्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे.” त्यांनी सरकारकडून श्वेत पत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना कोर्टात खेचण्याची पाळी आल्याचेही त्यांनी सांगितले.


