
पनवेल जितिन शेट्टी : पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवेतील खांदेश्वर रेल्वे स्थानक हे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकांनी या परिसरात घरे घेतल्याने या स्थानकावर नेहमीच प्रचंड गर्दी असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात खांदेश्वर स्थानकाच्या फलाटावर छप्पर नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
पाऊस पडत असताना फलाटावर ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना पावसात भिजावे लागत आहे. संपूर्ण फलाटावर पाणी साचत असल्याने घसरण्याचा धोका वाढला आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची भीती प्रवाशांमध्ये आहे. रेल्वे प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर स्थानिक प्रवासी संताप व्यक्त करत असून, तातडीने फलाटावर छप्पर बसवण्याची मागणी करत आहेत.
“प्रवासादरम्यान सुरक्षितता आणि सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. मात्र, खांदेश्वर स्थानकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात छप्पर नसल्याने आम्हाला खूप त्रास होतो,” असे एका नियमित प्रवाशाने सांगितले.
रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा, याविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.





