Devendra Fadnavis : फडणवीसांचे स्पष्टीकरण! – ‘नाराजी नाही, मुंबईत फक्त महायुतीचा झेंडा महत्त्वाचा’; बीएमसी निवडणुकीत विजयाचा फॉर्म्युला ठणकावून सांगितला

Devendra Fadnavis On Mumbai BMC : “कल्याण-डोंबिवलीत भाजप प्रमुख पक्ष”; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानाचे केले समर्थन, निवडणुका जिंकणे हाच अंतिम उद्देश
मुंबई :- आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा रंगली असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर महत्त्वपूर्ण भाष्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नाराजीच्या चर्चा फेटाळून लावताना फडणवीस म्हणाले, “मला वाटते की, कोणामध्ये फार काही नाराजी असेल असे मला वाटत नाही. कार्यकर्त्यांना वाटते की, जास्त संधी मिळाली पाहिजे, पण यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचे आहे की, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं आणि मुंबईत विकासमुख व पारदर्शक शासन आणणं.” याच उद्देशाने आम्ही महायुतीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण-डोंबिवलीवर भाजपचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेबद्दल भाजपमुळे शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चांवरही फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले.भाजप फक्त 55 जागांची मागणी का करेल? असा सवाल करत ते म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीत मागच्यावेळी आमच्या 42 जागा आल्या होत्या. त्यामुळे आम्ही तिथे प्रमुख पक्ष आहोत आणि तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत – शिवसेना आणि भाजप. आम्ही आपापसात बसून तिथे जागा वाटप करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
एका विशिष्ट योजनेबाबत अजित पवार यांनी केलेल्या विधानाचेही त्यांनी समर्थन केले. “अजित पवारांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे. गरजू लोकांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागेल,” असे फडणवीसांनी सांगितले.शेवटी, “निवडणुका जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला” असल्याचे फडणवीसांनी ठणकावून सांगितले.


