
पणजी | ५ सप्टेंबर २०२५ शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी काम करतात आणि समाज घडवण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत CM Pramod Sawant यांनी काढले. पणजी येथील कला अकादमीमध्ये आयोजित ‘मुख्यमंत्री वसिष्ठ गुरु पुरस्कार वितरण सोहळ्या’त ते बोलत होते. या वेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एससीआरटीच्या मेघना शिरगांवकर, ‘समग्र शिक्षण’चे शंभू घाडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘म्हजी लॅब बरी लॅब’ पुरस्कारही प्रथमच देण्यात आला.




सरकारी शाळा : गुणवत्ता आणि उज्ज्वल भविष्याचा पाया
पालकांनी सरकारी शाळांकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यभरातील शाळांवर विद्या समीक्षा केंद्राद्वारे मार्गदर्शन केले जाते, तसेच शिक्षकांना सातत्याने आधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. नुकत्याच काही शिक्षकांना बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रशिक्षण मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
प्राथमिक ते व्यावसायिक शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती
शिक्षण घेताना आर्थिक समस्या अडथळा ठरू नये, यासाठी सीएम स्कॉलरशीप पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यावर प्राथमिक ते व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज करता येणार आहे. एसी, एसटी, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. गोवा हे कोडींग आणि रोबोटिक्स शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सध्या सायबर सुरक्षा सारख्या विषयांचे शिक्षण देण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्ञानाबरोबर जीवनमूल्ये हीच खरी ताकद
“जो विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या मागे राहतो, त्यालाही कौशल्यांच्या आधारे पुढे नेण्याची ताकद शिक्षकांमध्ये असते,” असे डॉ. सावंत म्हणाले. बेब्रास इंडिया चॅलेंज २०२४ मध्ये गोव्याचे २२ विद्यार्थी देशातील अव्वल क्रमांकावर आले आहेत. बाळ्ळीच्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्याला जपानला जाण्याची संधी मिळाली, याचे श्रेयही शिक्षकांना जाते, असे त्यांनी सांगितले.
विकसित गोव्यासाठी शिक्षकांचे योगदान
“निवृत्तीनंतरही शिक्षकांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. विद्यार्थी पालकांपेक्षाही शिक्षकांच्या जवळ असतात. शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल आहेत. विकसित भारत २०४७ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित गोवा २०३७ साध्य करण्यामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असेल,” असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.



