सोलापूर

Eknath Shinde : ‘राजकारण बाजूला ठेवून मदत करा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना दिले जीवनावश्यक साहित्य, सरकार पाठीशी उभे असल्याचा दिला विश्वास

•सोलापूर जिल्ह्यातील कारंजा येथे शेतकऱ्यांशी संवाद; 98 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे मान्य

सोलापूर :- राज्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज थेट बांधावर पोहोचले. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कारंजा गावात पूरग्रस्तांना 50 ट्रक भरून जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना तात्काळ मदत केली जाईल.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, 98 हजार हेक्टर शेतीचे पीक उद्ध्वस्त झाले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी मान्य केले. ते म्हणाले, “हे एक आसमानी संकट आहे. घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत.” शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

तात्काळ मदत आणि विरोधकांवर टीका

शिंदे म्हणाले की, सध्या पूरग्रस्तांना कपडे, धान्य, भांडी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची तातडीने गरज आहे. म्हणून सरकारने प्रथम तातडीची मदत पोहोचवली आहे. पाणी ओसरल्यावर पंचनामे करून निश्चित केलेली नुकसान भरपाई दिली जाईल. “नुकसान मोठे असल्यामुळे मदतीचे नियम शिथिल करावे लागतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संकटाच्या काळात राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी नाव न घेता टीका केली. मदत साहित्यावर फोटो लावण्याच्या आरोपावर उत्तर देताना ते म्हणाले, “जे फक्त फोटोवर लक्ष देतात, त्यांना राजकारण करायचे आहे. ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांनी कधी एक किलो धान्य तरी शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन दिले आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

vivek

Recent Posts