Kalyan Water Cut : कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान! 1 जुलैला पाणीकपात, साठा करून ठेवा

•नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रांचा पुरवठा पूर्णत: बंद
कल्याण | कल्याण आणि डोंबिवली परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची खबरदारी! मंगळवार, 1 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. टाटा पॉवरच्या कांबा उपकेंद्रातील एनआरसी-2 फिडरच्या देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणकडून हा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रांनाही वीज मिळणार नाही.
टाटा पॉवरच्या कांबा उपकेंद्रात सात तास दुरुस्ती
या कालावधीत नेतिवली आणि मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्णतः बंद राहणार असल्याने, त्यातून होणारा कल्याण ग्रामीण भाग, पश्चिम कल्याण, डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प होईल. यामध्ये मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, मोहने यांसारख्या गावांचा समावेश असून, योगीधाम, मिलिंदनगर, चिकनघर, मुरबाड रोड, म्हाडा वसाहत अशा शहरातील भागांनाही याचा फटका बसणार आहे.
महावितरणकडून पालिकेला याबाबत अधिकृत पत्र दिलं असून, मागील काही महिन्यांत याच उपकेंद्रात याआधीही अशा देखभाल दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना याची सवय झाली असली, तरी यावेळी दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, एक दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा करून ठेवावा, जेणेकरून या तांत्रिक देखभालीच्या कामामुळे होणाऱ्या अडचणी टाळता येतील.


