Kalyan Traffic Jam : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसेचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

•राजू पाटील यांचे थेट उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, ‘बालकमंत्री’ आणि ‘भ्रष्टनाथ’ असे संबोधून काढले चिमटे
कल्याण :- रक्षाबंधनानिमित्त सलग तीन दिवस कल्याण-शिळफाटा रस्त्यावर झालेल्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले. या कोंडीवरून मनसे नेते राजू पाटील यांनी संतप्त फेसबुक पोस्टद्वारे महायुती सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ‘बालकमंत्री’ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भ्रष्टनाथ’ अशी उपमा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.
‘मलिदा खाऊन झाला, पण ट्रॅफिकचा प्रश्न सोडवेना’
राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “रस्ते रुंदीकरण, पूल आणि दुरुस्तींच्या नावाखाली मलिदा खाऊन झाला. आता पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली नवीन मलिदा खाण्याची वेळ आली आहे, पण ट्रॅफिकचा प्रश्न सोडवणे मात्र या ‘बालकमंत्र्यांच्या’ आणि ‘भ्रष्टनाथांच्या’ आवाक्याबाहेर आहे.” त्यांनी मंत्र्यांच्या चॉपर आणि हवाईमार्गाने होणाऱ्या प्रवासावर बोट ठेवत, सामान्य नागरिकांच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला.
‘धर्म आणि भावनेच्या आहारी जाऊन मतदान’
पाटील यांनी पुढे राजकीय भ्रष्टाचारावरही टीका केली. “हे सत्ताधारी टक्केवारीतून ओरबाडलेला पैसा वापरून पक्ष फोडतात आणि ‘गद्दार गँग’ वाढवतात,” असा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर दररोज वाहतूककोंडीचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांनाही त्यांनी लक्ष्य केले. “आश्चर्य त्या लोकांचे आहे, जे रोज या कोंडीने त्रस्त होऊनही धर्म आणि भावनेच्या आहारी जाऊन या ‘बकासुरांना’ मतदान करतात,” असे ते म्हणाले.


