Kalyan Local News : ‘मराठी न बोलल्याने’ तरुणाची आत्महत्या : कल्याण लोकल प्रकरणावरून राजकारण ‘भडकले’!

•ठाकरे बंधू विरुद्ध भाजप: ‘विष पेरणी’च्या आरोपांनी निवडणुकीच्या तोंडावर ‘मराठी अस्मिता’ पेटली!
कल्याण :- कल्याण लोकलमध्ये केवळ मराठी भाषेत बोलला नाही म्हणून 19 वर्षांच्या अर्णव खैरे या महाविद्यालयीन तरुणाला एका टोळक्याने केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अर्णवने या मारहाणीमुळे आलेल्या तणावातून घरी येऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या अत्यंत दुःखद आणि क्रूर घटनेनंतर, आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा संवेदनशील ‘मराठी-अमराठी’ भाषिक अस्मितेचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.
अमित साटम यांचा ‘जहरी’ हल्ला: ‘ठाकरे बंधूंनी पेरलेल्या विषाचे परिणाम!’
या प्रकरणाचे थेट खापर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ‘ठाकरे बंधूंवर’ फोडले आहे. त्यांनी समाजमाध्यमांवरून अत्यंत जहरी टीका केली. साटम यांनी आरोप केला आहे की, “ठाकरेंकडून उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आता आपल्या दारात येऊन पोहोचली आहे. ठाकरे बंधू समाजात जे विष पेरत आहेत, त्याचे काय परिणाम होत आहेत ते पाहा.” इतकेच नव्हे तर, “ठाकरेंची मुले फ्रेंच आणि जर्मन शिकणार आणि तुम्ही एक वाक्य हिंदीत बोललात तर जीवानिशी जाणार,” अशा शेलक्या शब्दांत त्यांनी भाषिक राजकारणावर निशाणा साधला.
किशोरी पेडणेकरांचे ‘मालवणी’ प्रत्युत्तर: भाजपवर ‘द्वेषाची पेरणी’ केल्याचा आरोप
भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या टीकेला शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी तितक्याच धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिले. पेडणेकर यांनी साटम यांच्यावर टीका करताना म्हटले की, “अमित साटम हे सकाळी उठल्यापासून देवाचे नाव घेण्याऐवजी केवळ उद्धव ठाकरे यांचेच नाव घेत असतात.” त्यांनी मालवणी भाषेचा उल्लेख करत साटम यांचा ‘गाळीयारो’ असा उल्लेख करून त्यांच्यावर टीकास्र सोडले. भाजपने ‘धर्माचा द्वेष करण्याचे विष’ पेरले असून, त्याचेच हे परिणाम असल्याचा प्रतिहल्ला त्यांनी केला. त्याचबरोबर, अर्णव खैरेला मारहाण करणाऱ्यांना त्वरित कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली.



