नाशिक
Trending

Raj Thackeray : राज ठाकरेंचा ‘साधूग्राम’वर थेट हल्ला! – “कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडं तोडून जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव!”

Raj Thackeray On Nashik Kumbhmela : मनसे प्रमुखांकडून सरकारवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरेही मैदानात; नाशिककरांना ‘संघर्ष वाढवू नका’ असे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई :- नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela 2027) तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यासाठी 1800 झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयावरून आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यावरणप्रेमी आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर आता राज ठाकरेंच्या एन्ट्रीमुळे हा वाद अधिकच वाढला आहे.

राज ठाकरे यांनी शनिवारी एका फेसबुक पोस्टद्वारे भाजप सरकारवर गंभीर आरोप केले.’झाडं तोडणं म्हणजे उद्योगपतींना दान’मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी झाडं तोडण्यामागे साधूग्राम नसून, उद्योगपतींना जमीन देण्याचा डाव असल्याचा थेट आरोप केला आहे.

राज ठाकरे म्हणाले

आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ?

बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो.

आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत !

नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा.

तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच ! राज ठाकरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0