
Jayant Patil On Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाला कुणाची नजर लागली? | विलासराव, मुंडे, आबांनंतर दादांच्या जाण्याने जयंत पाटलांनी व्यक्त केली हळहळ
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणाला कुणाची नजर लागली माहीत नाही, पण मोठ्या अपेक्षेने ज्या नेत्यांकडे पाहिले जाते, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची ही कोणती पद्धत आहे?” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील Jayant Patil यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना जयंत पाटील अत्यंत भावूक झाले होते.
‘राजकारणाच्या इतिहासातील अटळ नाव’
जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या राजकीय उंचीचा उल्लेख करताना सांगितले की, “गेल्या दोन दशकांपासून अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. दादा काय भूमिका घेतात, यावर राजकारण ठरायचे. जेव्हा कधी राज्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अनेक दिग्गजांची नावे येतील, पण अजितदादांच्या नावाशिवाय तो इतिहास पूर्ण होऊच शकणार नाही.” त्यांनी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनाची आठवण काढून दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अधोरेखित केली.
स्पष्टवक्तेपणाचा ‘तो’ रंजक किस्सा
दादांच्या रोकठोक स्वभावावर बोलताना जयंत पाटील यांनी एक जुनी आठवण सांगितली. “दादा जे मनात येईल ते स्पष्ट बोलायचे. एकदा एका सभेत ते आर. आर. आबांच्या तंबाखू खाण्यावरून जाहीरपणे बोलले होते. आबांना कदाचित त्याचे वाईट वाटले असेल म्हणून मी त्यांच्या घरी माफी मागायला गेलो होतो. पण मनातून दादांचे बोलणे चुकीचे नव्हते, हे आबांनाही ठाऊक होते. जे चुकीचे आहे ते तोंडावर सांगण्याची हिंमत फक्त दादांकडे होती.”
“तू मोठ्या बापाचा, मी मोठ्या काकांचा!”
शरद पवारांवरील अजितदादांच्या प्रेमाचा उल्लेख करताना जयंत पाटील म्हणाले की, “दादांनी एकदा भाषणात म्हटले होते की, ‘तू असशील मोठ्या बापाचा, पण मी पण मोठ्या काकांचा आहे!’ या एका वाक्यातून त्यांचे पवार साहेबांवरील निस्सीम प्रेम दिसून येते.” संघर्षाच्या काळातही दादांनी पक्षासाठी घेतलेले निर्णय आणि त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती, असेही पाटील यांनी नमूद केले.
मुख्यमंत्रिपदाबाबत व्यक्त केली खंत
“अजितदादा जर आज आपल्यात असते, तर ते कधी ना कधी महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर (मुख्यमंत्री) नक्कीच बसले असते,” अशी खंतही जयंत पाटील यांनी व्यक्त केली. शेवटच्या काही दिवसांतील भेटींचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, दादांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. नियतीने असा नेता हिरावून नेणे, हे राज्यासाठी मोठे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.



