
Raj Thackeray On Mahayuti : नाशिकच्या सभेत राज ठाकरेंची बॅटिंग; “दत्तक घेणारे फडणवीस पुन्हा दिसलेच नाहीत” म्हणत गिरीश महाजन आणि भाजपवर डागली तोफ.
नाशिक | नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या Nashik BMC News रणधुमाळीत राज ठाकरे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. “सरकार महिलांना 1500 रुपये देत आहे, पण आज महागाई इतकी वाढली आहे की गॅस सिलेंडरच 1000 रुपयांना मिळतो. अशा वेळी हे 1500 रुपये फक्त 15 दिवस तरी टिकतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या पैशांना भुलून मतदान केल्यास तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला दोष देतील, असा इशाराही त्यांनी दिला. Nashik Latest News
‘आई-बाप विकले गेले, असं मुलं म्हणतील’
राज ठाकरे यांनी मतदारांना सावध करताना म्हटले की, “उद्या तुमची मुलं म्हणतील की आमच्या भवितव्याचा कोणी विचारच केला नाही. आमचं शहर अधोगतीला गेलं कारण आमचा बाप विकला गेला आणि आईने पैसे घेतले. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या तोंडून हे शब्द ऐकायचे नसतील, तर मनसे-शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या.”
भाजपच्या ‘दत्तक’ विधानाची उडवली खिल्ली
भाजपवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, 1952 साली स्थापन झालेल्या (जनसंघापासून) पक्षाला 2026 मध्येही निवडणुकांसाठी दुसऱ्याची पोरं दत्तक घ्यावी लागतात, हे दुर्दैव आहे. “नाशिकला दत्तक घेतो असं सांगणारे देवेंद्र फडणवीस निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा इकडे फिरकलेच नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच गिरीश महाजन यांचे नाव न घेता, “ज्यांनी तपोवनातील झाडं तोडली, त्यांनी आधी आपल्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते छाटले आणि आता बाहेरचे लोक पक्षात आणले आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह
राज्यातील महापालिका निवडणुका चार वर्षे उशिराने का होत आहेत, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. नाशिककरांनी आम्ही सत्तेत असताना केलेली विकासकामे विसरू नयेत आणि केवळ आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



