Islampur Rename as Ishwarpur: सांगलीतील इस्लामपूर शहराचं नाव आता ‘ईश्वरपूर’!

Islampur Rename as Ishwarpur: केंद्र सरकारने अधिकृत दिली मान्यता; सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाचं पाऊल – नितेश राणे
मुंबई :- महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव आता अधिकृतपणे बदलण्यात आलं असून, या शहराला आता ‘ईश्वरपूर’ म्हणून ओळखले जाईल.Islampur Rename as Ishwarpur भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पत्राच्या आधारे आणि भारतीय सर्वेक्षण संस्थेने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाव बदलाची प्रक्रिया
इस्लामपूर नगर परिषदेनं 4 जून 2025 रोजी शहराचं नाव ‘ईश्वरपूर’ असं बदलण्याचा ठराव मंजूर केला होता.सांगलीचे वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेच्या मिरज येथील सहाय्यक विभागीय अभियंता यांनीही या प्रस्तावाला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी केले होते.
भारतीय सर्वेक्षण संस्थेनं (Survey of India) छाननी आणि जागेची पडताळणी केल्यानंतर नाव बदलण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मान्यता दिली.
भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक सर्वेक्षक तुषार वैश यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला राजपत्र अधिसूचना (Gazette Notification) लवकरच जारी करण्याची विनंती केली आहे.
हा बदल प्रादेशिक संस्कृती आणि पारंपरिक ओळखीचा आदर करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचं स्थानिकांचं मत आहे.
मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया
राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे.राणे म्हणाले की,”महाराष्ट्रातील इस्लामपूर आता ईश्वरपूर झालं आहे. केंद्र सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे.”
“यासाठी स्थानिक पातळीवर व्यापक जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. एक हिंदू म्हणून मीसुद्धा या मोर्चेत सहभागी झालो होतो. त्या मोर्च्यामुळे आज इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यात आलं आहे.”
“हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नाही, तर हिंदू संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आहे.”
राणे यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.



