
India’s 79th Independence Day 2025 LIVE Updates: शिवसेना भवन बाहेर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण
मुंबई :- भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. India’s 79th Independence Day 2025 LIVE Updates यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथे ध्वजवंदन केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण करून जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवला. अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यात ध्वजवंदन झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे ध्वजारोहण केले.
‘ऑपरेशन सिंदूर’मधील यशाबद्दल अजित पवारांकडून अभिनंदन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधील भारतीय सैन्य दलाच्या अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन केले. “भारतीय सैन्याने शत्रुराष्ट्राला योग्य जागा दाखवून आपली अद्वितीय क्षमता जगासमोर सिद्ध केली आहे. या मोहिमेत पराक्रम दाखवणाऱ्या जवानांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेनुसार महाराष्ट्र औद्योगिक, कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले.







‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’ द्वारे दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानला जशास तसे उत्तर!; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी भाषणात त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’ द्वारे भारताने दहशतवाद्यांना योग्य प्रत्युत्तर दिल्याचा उल्लेख केला. तसेच, देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी आल्याचे अधोरेखित केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा पालकमंत्री म्हणाले, “ज्या वीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली, त्यांचा विसर पडता कामा नये. आज देशाची चौफेर प्रगती होत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’ द्वारे आपण दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे आणि आसिफ मुनीरच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही. अमेरिकेने टॅरिफ लादले असले तरी भारत आत्मनिर्भर असल्याने त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर विशेष परिणाम होणार नाही.”


