Ind vs Sa 2nd T-20 : टीम इंडियाचा गेम ओवर ! – क्विंटन डी कॉकच्या तुफानी 90 धावा; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 51 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी

• गोलंदाजांची धुलाई, फलंदाजांचे अपयश; अर्शदीप सिंगने एकाच षटकात टाकले 7 वाइड बॉल्स, तिलक वर्माचे अर्धशतक व्यर्थ
Ind vs Sa 2nd T-20 :- न्यू चंदीगड मुल्लानपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाला सर्वच विभागात अपयशाला सामोरे जावे लागले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचे मोठे आव्हान ठेवले, ज्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. परिणामी, दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 51 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
दक्षिण आफ्रिकेची तुफानी फलंदाजी
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला ओपनर क्विंटन डी कॉकने एकट्याने तारले. त्याने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई करत केवळ 46 चेंडूत 90 धावांची तुफानी खेळी केली, ज्यात 7 षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. कर्णधार एडन मार्करमने (29) चांगली साथ दिली. डी कॉक बाद झाल्यानंतर डोनोवन फरेरा (16 चेंडूत 30* धावा) आणि डेव्हिड मिलर (12 चेंडूत 20* धावा) यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत संघाला 20 षटकांत 4 गडी गमावून 213 धावा गाठून दिल्या.
अर्शदीप सिंगची निराशाजनक गोलंदाजी
भारताकडून सर्वात निराशाजनक कामगिरी गोलंदाजीत अर्शदीप सिंगची झाली. त्याने आफ्रिकेच्या डावातील 11 वे षटक टाकताना तब्बल 7 वाइड बॉल्स टाकल्या. संपूर्ण सामन्यात त्याने 4 षटकांत एकूण 9 वाइड बॉल्स टाकल्या, ज्या भारतासाठी डोकेदुखी ठरल्या.
भारतीय फलंदाजांचे लोटांगण
214 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात फारच खराब झाली.उपकर्णधार शुभमन गिल खातेही न उघडता बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादव (5) आणि अभिषेक शर्मा (17) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताचा स्कोर तेव्हा 32/3 असा होता.तिलक वर्मा याने एकाकी लढत दिली आणि त्याने फक्त 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही.
हार्दिक पांड्या (20) आणि अक्षर पटेल (21) यांनी प्रयत्न केले, पण ते मोठे स्कोअर करू शकले नाहीत.दक्षिण आफ्रिकेकडून ओटेनले बार्टमनने 4 विकेट्स घेत भारताला मोठा धक्का दिला, तर लुंगी एनगिडी, मार्को जानसेन आणि लुथो सिपामला यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.



