IND Vs PAK Match Update : भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाचा दणदणीत विजय; कर्णधार सूर्यकुमार यादवचा आक्रमकपणा चर्चेत

•Asia Cup 2025 : 128 धावांचे आव्हान एकतर्फी जिंकले; नाणेफेक आणि सामन्यानंतरही ‘हात मिळवणे’ टाळले
ANI :- आशिया चषक 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानने दिलेले 128 धावांचे आव्हान सहज पार केले. मात्र, या विजयापेक्षाही सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतर घडलेल्या काही घटनांची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
सूर्यकुमार यादवचा आक्रमकपणा
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेकीच्या वेळी दोन्ही संघांचे कर्णधार हात मिळवतात, ही परंपरा आहे. परंतु, पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव हात न मिळवताच निघून गेला. याच आक्रमक भूमिकेचा प्रत्यय सामन्याच्या शेवटीही आला.
अभिषेक, तिलक आणि कुलदीपची शानदार कामगिरी; सूर्याच्या षटकाराने विजयावर शिक्कामोर्तब
भारतीय संघाला विजयासाठी 128 धावा करायच्या होत्या. अभिषेक शर्माने 31 धावांची चांगली सुरुवात दिली, तर शुभमन गिल (10 धावा) लवकर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा (31 धावा) आणि सूर्यकुमार यादव (47 धावा, नाबाद) यांनी चांगली भागीदारी केली. अखेर शिवम दुबे (10 धावा, नाबाद) सोबत सूर्यकुमार यादवने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवण्यासाठी मैदानावर एकत्र येतात. पण, या सामन्यात तसे झाले नाही. विजयानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे थेट मैदानाबाहेर ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला.
भारतीय खेळाडूंची कामगिरी
या सामन्यात भारताच्या गोलंदाजीने पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवले. कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत सर्वाधिक 3 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी मिळवले, तर हार्दिक पांड्याने 1 बळी घेतला. पाकिस्तानने 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 127 धावा केल्या.
फलंदाजीत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीने भारताचा विजय सोपा झाला.



