
Ind Vs Eng Match Highlights : 42 चेंडूत 89 धावांची खेळी करूनही संजूचा मनाचा मोठेपणा | “बुमराहसारखा गोलंदाज दशकातून एकदाच जन्माला येतो” | 8 मार्चला अहमदाबादमध्ये भारत-न्यूझीलंड फायनलचा थरार
मुंबई (वानखेडे स्टेडियम) :- टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला 7 धावांनी नमवून भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयाचा नायक ठरलेल्या संजू सॅमसनला ‘सामनावीर’ (Man of the Match) पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, हा पुरस्कार स्वीकारताना संजूने जो मोठेपणा दाखवला, त्याने 89 धावांच्या खेळीपेक्षाही जास्त चर्चा बटोरली आहे. “माझा हा पुरस्कार खरंतर जसप्रीत बुमराहला द्यायला हवा,” असे उद्गार काढत संजूने बुमराहच्या गोलंदाजीचा गौरव केला.
बुमराहची ‘ती’ 4 षटके निर्णायक
ज्या खेळपट्टीवर फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आणि 500 हून अधिक धावा कुटल्या, तिथे जसप्रीत बुमराहने आपल्या 4 षटकांत केवळ 33 धावा देत 1 बळी मिळवला. संजू सॅमसन म्हणाला, “विजयाचे खरे श्रेय बुमराहला जाते. त्याने शेवटच्या षटकांमध्ये ज्या प्रकारे यॉर्कर आणि स्लोअर वनचा मारा केला, त्यामुळेच आम्ही हा सामना जिंकू शकलो. तो नसतं तर मी आज हा पुरस्कार घेण्यासाठी इथे उभा नसतो. असा गोलंदाज दशकातून एकदाच जन्माला येतो.”


शतक हुकल्याचं शल्य नाही!
केवळ 11 धावांनी शतक हुकले असूनही संजूच्या चेहऱ्यावर त्याचा खेद नव्हता. तो म्हणाला, “टी-20 क्रिकेटमध्ये तुम्हाला डावाची आखणी करायला वेळ नसतो. जास्तीत जास्त धावा करणे हेच आमचे उद्दिष्ट होते. वेस्ट इंडिजविरुद्ध गवसलेला फॉर्म मी इथे कायम ठेवला. वानखेडेवर चेंडू उशिराने खेळण्याचे माझे नियोजन यशस्वी ठरले. मला वैयक्तिक शतकापेक्षा संघाच्या विजयाचे अतीव समाधान आहे.”
जेकब बेथेलच्या झुंजीचेही कौतुक
इंग्लंडच्या जेकब बेथेलने केलेल्या शतकी खेळीबद्दल बोलताना संजूने सांगितले की, “हा सामना खऱ्या अर्थाने सेमी फायनलला साजेसा झाला. बेथेलने आम्हाला विजयापासून रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण आमच्या गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. ड्रेसिंग रूममध्येही आमची हीच चर्चा होती की धावांचा पाठलाग करणे इथे सोपे आहे, त्यामुळे आम्हाला 250 पार जाणे आवश्यक होते.”



