
Maharashtra Weather Update News : पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसाचा जोर, सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात
मुंबई :- शुक्रवार सकाळपासूनच मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर गडचिरोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. Maharashtra Weather Update News
सकाळपासूनच पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसाचा जोर दिसून येत आहे, सोबतच जोरदार वाऱ्यानेही हजेरी लावली आहे. शुक्रवार असल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना पावसातून वाट काढत जावे लागत आहे. अनेकजण छत्री आणि रेनकोटचा आधार घेऊन प्रवास करत आहेत. वांद्रे स्थानकावर लोकल सेवा सध्या वेळापत्रकानुसारच सुरू असली तरी, पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. Mumbai Rain Update
मुंबई आणि उपनगरांमध्ये, विशेषतः अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज आणि वांद्रे या पश्चिम उपनगरांतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विलेपार्ले ब्रिजखाली पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. महानगरपालिकेचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून, पाणी उपसण्यासाठी पंपांचा वापर केला जात आहे. प्रशासनाकडून तातडीने पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे ठाण्यातही सखल भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गडचिरोलीत रेड अलर्ट, जनजीवन विस्कळीत:
गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. आज गडचिरोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुलचेरा तालुक्यातील सर्व शाळांना तहसीलदारांनी सुट्टी जाहीर केली आहे. काल झालेल्या पावसामुळे आलापल्ली येथील 17 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. सध्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी, वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. लहान नद्या आणि नाल्यांना पूर आल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


